चिखलगावातील वाढत्या अतिक्रमणाला पदाधिकाऱ्यांचे पाठबळ
ग्रामस्थांच्या तक्रारीला केराची टोपली
वणी:- शहरालगत असलेल्या चिखलगाव प्रामुख्याने मूळ गावात जागोजागी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या अतिक्रमण करण्यात आले आहे. परिणामी ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासन तसेच सरपंच यांना वारंवार तक्रारी निवेदने देऊनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शेवटी नाईलाजास्तव ग्रामस्थांनी वाढलेले अतिक्रमण तात्काळ काढून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करीत वरिष्ठांना निवेदन सादर केले आहे. Office bearers support increasing encroachment in Chikhalgaon।
अतिक्रमणामुळे वाढल्या समस्या
चिखलगावातील रस्त्यालगत जागोजागी अतिक्रमणे वाढल्याने सांडपाण्याच्या नाल्या तुडुंब भरत आहे. ये-जा करणाऱ्याला नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. आरोग्याच्या तक्रारी वाढल्या असताना ग्रामपंचायत प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आले आहे.
निवेदन देतांना रोहन वरारकर, वसंता डवरे,मनोज नवले, रोशन ढुमणे, द्रविड रांगणकर, चेतन खापणे, प्रमोद गौरकार अक्षय दडांजे, प्रशांत मोहुर्ले, क्रिष्णा अणे, साहिल कुडमेथे, भगवान वाभिटकर, आर्यन ढुमणे सह ग्रामस्थ उपस्थित होते.
पदाधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष!
चिखलगाव ग्रामपंचायत हद्दीत शासकीय जागांवर अवैध अतिक्रमण करण्यात आले आहे. याबाबत वारंवार तक्रारी सुद्धा दिल्या आहेत. सर्व सदस्यांनी वरिष्ठांकडे केलेल्या तक्रारीला समर्थन दिले असताना एकाच कुटुंबातील दोघेही सरपंच उपसरपंच असल्याने त्यांनी या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. एकूणच गावातील वाढत्या समस्येला सरपंच, उपसरपंच व ग्राम विकास अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे.

